Home » दोन थेंबांनी रोगावर काय फरक पडणार?

दोन थेंबांनी रोगावर काय फरक पडणार?

by नवस्वराज
0 comment

– डॉ. शैलेश गांगलवार

कोणताही आजार झाला की त्यावर औषधोपचार हे गरजेचेच ठरतात. तुम्ही डॉक्टरकडे गेले की ते तुम्हाला औषधी लिहुन देतात. अॅलोपॅथी औषधी असतील तर अॅसिडिटी कमी करणारे औषध, मुख्य रोगावर नियंत्रण मिळविणारे अॅन्टीबायोटिक, कमजोरी कमी करणारे मल्टीव्हिटॅमीन आदी अशी औषधे दिली जातात. आयुर्वेदिक उपचार असतील तर चुर्ण, काढा दिला जातो. पण होमिओपॅथीत आजारावर उपचार करण्यासाठी अगदी दोन किंवा तीन थेंब टाकलेल्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे बरेच जणांना प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या रोगावर हे दोन थेंब औषध आणि ते देखील साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांवर टाकलेले खरोखर काम करेल काय? चला तर आज यावरच विचारमंथन करू या….

होमिओपॅथीची मूळ कन्सेप्टच डायल्युटेड औषधीवर आहे. म्हणजे औषधी जेवढी सुक्ष्म तेवढा त्याचा परिणाम जास्त. होमिओपॅथीतील औषधे तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. वनस्पती आदींपासून अर्क काढला जातो. अल्कोहोलसोबत मिश्रण करून मग औषधी तयार केली जाते. या औषधींच्या पावर ठरतात. उदाहरणार्थ एखाद्याला अचानक अस्वस्थ वाटु लागले तर लक्षणानुसार एखादा होमिओपॅथीचा डॉक्टर एंग्झायटी किंवा पॅनिक अटॅक आला असल्याचे निदान करून रुग्णाला अॅकोनाईट नावाचे औषध देईल. अॅलोपॅथीत गोळीची पावर एमजी (मिलीग्राम) वरून ठरते. म्हणजे अॅझीथ्रोमायसिन 250 मिलिग्राम, अॅझीथ्रोमायसिन 500 मिलिग्राम. त्याच पद्धतीने होमिओपॅथीतही प्रत्येक औषधीच्या वेगवेगळ्या पावर असतात. त्याला वैद्यकीय भाषेत पोटेन्सी म्हणतात. त्यामुळे केवळ अॅकोनाईट देऊन चालणार नाही तर त्याची पोटेन्सीही ठरवावी लागते. जसे की अॅकोनाईट 30, अॅकोनाईट 200, अॅकोनाईट 1M. यातील काही पोटेन्सी कमी पावरच्या आणि काही हाय पावरच्या असतात. लक्षणे पाहुन त्या द्याव्या लागतात.

होमिओपॅथीच्या डॉक्टरने एकदा लक्षणांच्या आधारावर औषधी निश्चित केली की तो त्याची पोटेन्सीही ठरवतो. त्यानंतर साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांवर एक, दोन थेंब टाकुन रुग्णाला औषधी दिली जाते. लक्षणांच्या आधारावर योग्य औषधी (रेमेडी) निघाली असेल तर साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्याच काय तर सुईच्या थेंबाऐवढे औषधही एखादा रोग बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये ठेवतो. होमिओपॅथीला मी ‘सायलेन्ट डिसिज किलर’ असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण कोणतेही दुष्परिणाम होऊ न देता रोगाच्या मूळावर घाव घालण्याची महाशक्ती होमिओपॅथी औषधांमध्ये आहे. त्यामुळे दोन थेंबांनी रोगावर काय फरक पडणार? असे जर कोणी विचारले तर त्याला होमिओपॅथी उपचारांची ही थिअरी एकदा नक्की समजावून सांगा.

(लेखक हे अकोला येथील होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत.)

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!