नवी दिल्ली : महाराष्ट्र, गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात आहे. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत पाऊस आणि पुरामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
आसाममध्ये पुरामुळे मृतांची संख्या 200 च्या आसपास पोहोचली आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही अशीच परिस्थिती आहे. अंबिका नदीच्या काठावर अचानक पाणी वाढल्याने 16 सरकारी कर्मचारी अडकले. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चेतक हेलिकॉप्टरद्वारे 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशात, हवामान खात्याने 33 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात 24 तासांत वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील गोदावरी नदीने सोमवारी दुसऱ्या धोकादायक पातळीचे चिन्ह ओलांडले. त्यामुळे भद्राचलममध्ये पूर येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. पुराचा सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला आहे. येथील अनेक तालुक्यात 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गडचिरोली -भामरागड राष्ट्रीय मार्ग तब्बल 10 तास ठप्प होता. या भागातील रस्ता वाहून गेला. पुराचा भीषण तडखा बसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गडचिरोली गाठले. मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस आणि पुराचा वेढा कायम असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.