Home » डॉ. आंबेडकरांची दोन भाषणं पारायण करण्यासारखी : डॉ. मोहन भागवत

डॉ. आंबेडकरांची दोन भाषणं पारायण करण्यासारखी : डॉ. मोहन भागवत

by नवस्वराज
0 comment

नागपूर : संघाच्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणं आवर्जून वाचण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. ते मंगळवारी (२४ ऑक्टोबर) दसऱ्याच्या निमित्ताने नागपूर संघ कार्यालयात आयोजित विजय दशमी सोहळा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन उपस्थित होते.

“एकमेकांविषयी जो अविश्वास आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या देशात राजकारण स्पर्धेवर आधारित आहे. आपल्यामागे जास्त अनुयायी उभे रहावेत म्हणून समाजाची विभागणी केली जाते. दुर्दैवाने ही परंपराच झाली आहे. त्यामुळे राजकारणातून समाजातील अविश्वासाचं उत्तर सापडणार नाही. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून हा प्रश्न सुटेल, असं म्हणणं कुचकामी आहे”, असे मोहन भागवत म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत मोहन भागवत म्हणाले, “संविधानात एकतेला मार्गदर्शक तत्व म्हणून नमूद करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान संसदेत मांडताना दोन भाषणं केली. ती दोन भाषणं लक्षपूर्वक वाचले की, लक्षात येतं की त्यातही हाच बंधुत्वाचा संदेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ती दोन भाषण नक्की वाचा, वारंवार वाचा, असे भागवत म्हणाले.

“मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला आहे तो तसा घडलेला नाही. तो रणनीतीनुसार पार पडला आहे. जे काही घडले, शांतता भंग पावली, ती भंग केली गेली. ते पुढे म्हणाले की, गृहमंत्री तीन दिवस तिथे होते आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सरकारने कठोर पावले उचलली आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले”, विजयादशमीच्या मुहूर्तावर रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख मोहन भागवत यांनी हे मोठे वक्तव्य केले.

आपल्या देशाच्या खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच १०० हून अधिक पदके (२८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य) जिंकून आपल्या सर्वांचा उत्साह वाढवला आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. चांद्रयानाच्या बाबतीत उदयोन्मुख भारताची शक्ती, बुद्धिमत्ता आणि रणनीतीची झलकही जगाला दिसली. नेतृत्वाच्या इच्छेला आमच्या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्याची जोड दिली गेली. अंतराळ युगाच्या इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. तमाम भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे कार्य ज्या शास्त्रज्ञांनी पूर्ण केले आहे त्यांचे अभिनंदन करतो असे भागवत म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!