Mumbai : लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोराने कामाला लागले आहेत. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. मोठे राजकीय पक्ष नव्या सोबत्याचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जुने सोबती उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका विषद केली आहे.
एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, राजकीय मतभेद असतात, ते दूरही करता येतात. आमच्यात आणि तुमच्यात काही विषयांवर मतभेद असतील तर सार्वजनिक विचारसरणी, कॉमन ग्राउंड तयार करून आपण एकत्र येऊ शकतो. येथे आमचे मन दुखावले आहे, केवळ राजकीय मतभेद नाहीत. दिवस-रात्र ते आणि त्यांचे लोक आमचे नेते पंतप्रधान मोदींना शिव्या देतात. इतके तर आमचे विरोधक देखील करत नाहीत. त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही एकत्र येऊ शकतो. आता तो प्रश्नच राहीलेला नाही.
आम्ही दुखावले गेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र येणे शक्य नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी मोदींची स्तुती केल्याचे आठवत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत मोदींना 10 -20 शिव्या दिल्याशिवाय त्यांना अन्न पचत नाही. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. आम्ही आमच्या रस्त्यावर जात आहोत. फडणवीस यांना उद्धव ठाकरें सोबतच्या मैत्रीविषयी छेडले असता ते म्हणाले की, मित्र तो असतो जो एकमेकांचे काही पटत नसेल, तर फोन करून तसे सांगण्याची हिंमत दाखवतो. की हे होऊ शकणार नाही. ज्यावेळी युतीबाबत बोलणी सुरू होती, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री बनायचे होते. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, त्यावेळी ते आमचे सोबती होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, आमचे त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) रात्रंदिवस बोलणे होत असे. परंतु युतीबद्दल बोलणी झाली तेव्हा फोनवर आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही, असे सांगण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही. त्यांनी दरवाजा बंद केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मित्र आहेत की नाही, हा प्रश्न त्यांनाच विचारणे योग्य ठरेल. त्यानंतर आमच्यात औपचारिक बोलणे झाले नाही. आम्ही जेंव्हा समोरासमोर भेटतो तेव्हा नमस्कार-चमत्कार होतो.