अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपीट फटका देत आहे.
रविवार, १९ मार्च २०२३ रोजी मोठ्या प्रमाणावर वादळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अकोला जिल्ह्याला झोडपले. तेल्हारा आणि बार्शीटाकळी तालुक्यात यामुळे मोठे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आणि भीती वर्तविण्यात येत आहे.
अकोल्याला लागून असलेल्या वाशीम, मालेगाव, मेडशी, दिग्रस, अमरावती, मेळघाट, खामगाव, बुलडाणा आदी भागांमध्येही पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे लिंबुवर्गीय फळपिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी गहु आणि हरभऱ्याचेही नुकसान झाले आहे.