अकोला : नवरात्रीला सुरूवात झाली आहे. दसरा, दिवाळी तोंडावर आले आहेत. याचे औचित्य साधत प्रत्येक व्यक्ती मोठी खरेदी करतो. सध्या ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच प्रमाणे सर्व मोठ्या शहरात माॅल आहेत तेथे सर्व वस्तू मिळतात, भाजीपाला तसेच किराणा सामान देखील मिळते. थोडे स्वस्त देखील मिळत असेल. त्यामुळे ऑनलाईन तसेच शाॅपींग माॅल मधुन खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
दोन-तीन वर्ष मागे जाऊन आठवण्याचा प्रयत्न करा. कोरोना साथीचा भयंकर काळ देशभरात लाॅकडाऊन होता. ऑनलाईन शाॅपींग, माॅल बंद होते, अशा कठीण समयी आपल्याला किराणा, भाजीपाला वगैरे वस्तू जवळच्या दुकानदारांनी पुरवल्या. त्यावेळी स्थानिक दुकानदारच आपल्या कामास आला.
ऑनलाईन वस्तू थोड्या स्वस्त असल्या तरी वस्तू बाबत काही तक्रार निर्माण झाल्यास अत्यंत त्रास होतो. स्थानिक अधिकृत विक्रेत्याकडे खरेदी केल्यास वस्तू बदलविणे अथवा दुरुस्ती करणे सोयीचे होते. उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपनी बहुराष्ट्रीय आहेत. आपल्या व्यवहाराच्या माध्यमातून कंपनीला मिळालेला पैसा परदेशात जातो. ज्यामुळे आपल्या देशाचे आर्थिक नुकसान होते म्हणून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे.
नागरिकांनी ऑनलाईन तसेच माॅल मधून खरेदी करण्याचा मोह टाळावा. भाजीपाला, किराणा सर्व लहान- मोठ्या वस्तू स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी कराव्यात, असे आवाहन सनातन संस्कृती महासंघातर्फे करण्यात आल्याचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद गायकवाड, विजय केंदरकर, देवानंद गहिले यांनी कळविले आहे.