अकोला : महापालिकेद्वारे भोड येथे ‘स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन’ अंतर्गत २० टन प्रतिदिवस क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे महाराष्ट्रदिनी आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती केली जाणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल. त्यातून बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज २० टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. याचसोबत बायोगॅस प्रकल्पापासून १२०० ते १३०० घनमीटर गॅसची निर्मिती होणार असून, प्रकल्पामध्ये निघालेल्या गॅसचा वापर करून दररोज १५०० ते १६०० युनीट वीज निर्मितीसुद्धा होणार आहे. या विजेचा वापर प्रकल्प चालविण्यासाठी होईल.