Mumbai | मुंबई : भिवंडी शहरातील खाडी जवळील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात कापण्यात आलेल्या म्हशी व रेड्यांचे अपशिष्ट (Waste) इदगाह सॉल्टर हाऊस येथे टाकण्यात येते. त्यातील चरबी काढून, सुकवून त्यापासून तूप बनवण्याचे काम या भागात सुरू होते. हा प्रकार आता उघडकीस आला आहे.
चरबीपासून तयार करण्यात येणारे हे नकली तूप हॉटेल, खानावळी तसेच तळलेले पदार्थ विक्री करणाऱ्यांना देण्यात येत होते. हे तूप कोणत्याही परिस्थितीत सात्विक (Vegetarian) नाही. नकली तूप तयार करण्यासाठी म्हशी व रेड्यांच्या चरबीचा वापर केला जातो. त्यामुळे शाकाहारी नागरीकांच्या आरोग्याशी या प्रकारातून खेळ सुरू होता. (Bhivandi Municipal Corporation Officer’s Raid On Fake Ghee Factory)
यासंदर्भातील तक्रार भीवंडी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली. त्याची दखल घेत आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, आपत्कालीन विभागाचे प्रमुख साकिब खर्बे, कर मूल्यांकन विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक सायरा बानो यांनी महापालिका पथकासह छापा घातला.
कारवाईच्या ठिकाणी महापालिका पथकाला तूप कढवण्याची भट्टी सुरू असल्याचे आढळले. कढईतील साहित्य फेकून देत, बनावट तुपाचे 15 किलोग्राम वजनाचे 20 डबे, कढई व अन्य साहित्यसामग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी भोईवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे.