अमरावती : इर्विन चौक ते राजापेठला जोडणारा अमरावती शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी एक महिनाभर बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दोन गर्डरमध्ये अंतर निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अमरावती शहरातील राजापेठ-इर्विन उड्डाणपूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुलावरील गर्डर तीन इंच घसरले आहे. पुलामध्ये अंतर निर्माण झाल्याने हा मार्ग वाहतूक पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अकोला येथील एकमेव उड्डाणपूलही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. या पुलाच्या खाली असलेल्या जलवाहिनीमुळे जमिनीचा काही भाग खचला होता. तेव्हापासून अकोल्यातील हा एकमेव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र या पुलाच्या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी कुणीही आग्रही नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला अकोल्यातील उड्डाणपूल शोभेची वस्तू बनतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरीच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलासाठी आंदोलनही केले होते.