Lok Sabha Election : देशाला सुजलाम, सुफलाम महाशक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कमळ हाच पर्याय आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भाजप, मोदी सरकार व मित्रपक्षांविरोधात वेगवेगळ्या माध्यमातून अफवांचा बाजार निवडणुकीच्या काळामध्ये पसरणार आहे. यापासून सावध राहात मतदारांच्या थेट संपर्कात राहण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने करण्यासाठी जनसंपर्क संवाद कार्यक्रम सुरू केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
मूर्तिजापूर येथे ‘गाव चलो अभियान’ व लोकसभा निवडणूक नियोजन बैठकीसंदर्भात ते बोलत होते. आमदार हरीश पिंपळे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर मागटे पाटील, अकोला लोकसभा संयोजक विजय अग्रवाल, तेजराव थोरात, रावसाहेब कांबे, माधव मानकर राधिका तिवारी, भूषण कोकाटे, संजय इंगळे, सुनील ठाकरे, महादेव काकड, नारायण भटकर, नीलेश मानके, विजय गाडेकर, गणेश मुळे, प्रशांत ठाकरे, मोनाली गावंडे, कमलाकर गावंडे, पप्पू पाटील, शंकर महाले, कोमल तायडे, डॉ. अमित कावरे, अशोक राठोड, हिरासिंग राठोड आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांची ‘गॅरंटी’ असल्यामुळे जनतेचा विश्वास भाजपावर आहे. भारतीय जनता पार्टी व महायुती सरकार सर्वसामान्यांच्या समस्या निराकरणासाठी वचनबद्ध आहे. मित्रपक्षांशी संवाद साधत आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुती उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विरोधकांना दिवसरात्र मोदी आणि फडणवीस स्वप्नातसुद्धा दिसतात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यामुळे खालच्यास्तरावर टीकाटिपणी वेगवेगळ्या माध्यमातून व प्रसिद्धीसाठी केली जात आहे, असे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी केले. यावेळी संघटनात्मक बैठकीचा आढावा माधव मानकर यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीसंदर्भात विजय अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.