Home » महागावातील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्युचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश

महागावातील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्युचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश

by नवस्वराज
0 comment

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा महागाव येथील एकाच परिवारातील पाच जणांचा २० दिवसात मृत्यू झाला. रुग्णांना दवाखान्यात नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचीही प्रकृती खालवली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या पाच जणांना विष देऊन मारण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या २० दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांना अटक केली आहे.

२० सप्टेंबर २०२३ रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी शंकर कुंभारे व दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या पत्नी विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यु झाला. अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मूल येथे राहणारी साळी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला.

आई वडील उपचारासाठी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला. आई वडीलांच्या मृत्युनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचप्रमाणे शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथुन चंद्रपूर येथे उपचारासाठी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुस­ऱ्या दिवशीपासुन प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या साळीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला देखील  रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असुन प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत वैद्यकिय अधिकारी यांनी कळविले आहे.

मृत्यु पावलेल्या पाच व्यक्ती व सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये व डोक्यामध्ये प्रचंड वेदना व ओठ काळे पडुन जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसुन आली. या लक्षणावरुन मृत व आजारी व्यक्तींना कुठलीतरी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकिय अधिकारी यांनी वर्तवीला. परंतू एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्युमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अत्यंत गांभीर्याने घेवुन अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी सुदर्शन राठोड, अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांदे व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या तपास पथकास हा गुन्हा उघडकिस आणण्याची जबाबदारी सोपविली.

तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपनीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु केले. परिसरातील गोपनीय सुत्रांकडुन गावात शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवुन ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली. त्यावेळी त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सखोल तपास केला असता, महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याचेशी तिच्या आई वडीलांच्या विरोधात जावुन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडीलांनी आत्महत्या केली होती. याबाबत पती रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत, आरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सास­ऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागुन नेहमी वाद करीत असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे परिवार व त्यांचे नातलागांना विष देवुन जिवे ठार मारण्याची योजना आखली. त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावुन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये मिसळुन त्यांना खाण्यास दिले. त्या विषाचा हळुहळु परिणाम होवुन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली व त्यात पाच व्यक्तींचा मृत्यु झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता, परंतु तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवुन तो आजारी पडला. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अहेरी येथे खुनाचा गुन्हा नोंद करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड यांनी सुरू केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!