वाशीम : भरधाव एसटीचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे राष्ट्रीय महामार्गावर ५० प्रवाशांचे प्राण वाचले. वाशीम-मंगरूळपीर मार्गावर असलेल्या कळंबा महालीजवळ हा अपघात सुदैवाने टळला.
चालक आशिष सोहागपुरे यांनी हे प्रसंगावधान दाखविले.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा आगाराची बस क्रमांक एमएच १२- ईएफ ६३३९ हिंगोलीवरून अमरावतीसाठी निघाली. शनिवार, २० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही बस वाशीमवरून पुढील प्रवासासाठी निघाली. कळंबा महालीपासून काही अंतरावर असताना चालकाला बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. चालक सोहागपुरे यांनी तत्काळ स्टेअरिंग नियंत्रित करून बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबविली. बस अनियंत्रित झाली त्यावेळी त्यात ५० प्रवासी होते. ऐन पावसाळ्याच्या दिवसात हा प्रकार घडल्याचे कळल्यानंतर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. चालक सोहागपुरे यांनी हिंमत दाखविली नसती तर त्यांच्या व वाहकासह ५० प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गावर धोका निर्माण झाला असता.