High Court : निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. ईव्हीएम एक यंत्र असल्याने त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा लागू होतो. मात्र या कायद्याची पायमल्ली करून ईव्हीएम उपयोगात आणली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक पारदर्शीपणे होणे अशक्य आहे, असे याचिकेत नमूद आहे.
न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना येत्या 1 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या खंडपीठ समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढत आहेत.कायद्याचे पालन केल्याशिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व एसएलयू यंत्रांचा उपयोग व्हायला नको, अशी मागणी मानकर यांनी केली आहे.
कायद्याचे पालन होईपर्यंत बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मानकर यांच्यातर्फे विधिज्ञ नितीन मेश्राम व शंकर बोरकुटे आणि निवडणूक आयोगातर्फे नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.