नागपूर : भारताला सहजासहजी स्वातंत्र्यप्राप्ती झाली नाही. १८५७ पासून देशात झालेल्या उठावांचे फळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर येथील महाल भागात असलेल्या संघमुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘माझा देश मला काय देतो, हा प्रश्न सोडून द्या. आपण देशाला काय देत आहोत, याचा विचार करायला हवा. ज्यावेळी आपण हा संकल्प करू, तेव्हा जग आपल्याकडे आश्चर्याने बघेल. देशभक्तीचा भाव निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी आपले सर्वस्व दिले. त्यानंतर कुठे १५ ऑगस्टला १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण आपल्या मनातील देश घडवू शकतो’, असे डॉ. भागवत म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या.