Akola : हिंदू जनजागृती समितीच्यावतीने 14 मार्च रोजी गांधी रोडवर विविध विषयांना धरून आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे धीरज राऊत, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे संघटनमंत्री उदय महा, अधिवक्ता श्रुती भट, राष्ट्र जागृती मंचाचे अध्यक्ष संजय ठाकूर, सनातन संस्थेचे आनंदी वानखडे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश अग्रवाल, श्रीराम सेनेचे अध्यक्ष पप्पू मोरवाल यांनी विचार व्यक्त केले.
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्नरत आहेत, तर दुसरीकडे ‘दारुल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ ने फतवा काढला आहे. या फतव्यामुळे भारतात अशांतता निर्माण होऊन गृहयुद्धाची स्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सरकारने या संघटनेवर तत्काळ बंदी घालावी तसेच सर्व दोषी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे धीरज राऊत यांनी केले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. संदेशखळी येथील हिंदू महिलांवरील अत्याचार प्रकरण, मंदिरांवर आक्रमण, हिंदूंच्या हत्या, हिंदू उत्सवांच्या वेळी दंगल, दहशत पसरवणे हे पश्चिम बंगालमध्ये नित्याचेच झाले आहे. बंगालमधील ही परिस्थिती पहाता तेथील सरकार तत्काळ बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी उदय महा यांनी केली.
फेब्रुवारी 2024 मध्ये नगर जिल्ह्यातील सोनई तालुक्यातील नेवासा, येथील ‘विनियार्ड ब्लेस्ड चर्च मध्ये तीन ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी दोन अल्पवयीन मुलींमध्ये सैतान आहे असे सांगत लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. त्यामुळे या नराधम धर्मप्रचारकांवर पॉस्को तसेच ‘महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हे धर्मप्रचारक ज्या भागात धर्मप्रचार करत होते त्या भागातील अन्य किती मुली व महिलांचे शोषण झाले आहे, याचा शोध घेण्यासाठी हा तपास एनआयएकडे सोपवावा, असे अधिवक्त्या श्रुती भट म्हणाल्या.
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या काही हिंदू धार्मिक स्थळांमधे पूजा-अर्चना करण्यावरील निर्बंध उठवून पूजा-अर्चना करण्याची अनुमती द्यावी, सर्व धार्मिक स्थळांमध्ये दर्शनासाठी विनामूल्य प्रवेश द्यावा. धार्मिक स्थळांमध्ये पावित्र्य जपावे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वास्तूंमध्ये तसेच परिसरात झालेले अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे विचार संजय ठाकूर यांनी व्यक्त कले. संभाजी भिडे गुरुजी यांनी अनेक युवकांना दिशा देऊन देश व धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील केले आहे. त्यांच्यावर समाजकंटकांनी हल्ले केले आहेत. नाशिक जिल्ह्यतील मनमाड येथे 29 फेब्रुवारी रोजी समाजकंटकांनी त्यांच्या वाहनावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेच्या आनंदी वानखडे यांनी केली.
भिडे गुरुजींच्या वाहनावर झालेला हल्ला हा केवळ गुरुजींच्या गाडीवरील हल्ला नसून आपल्या अस्मितेवर झालेला, हिंदूंवर झालेला हल्ला आहे. काही हिंदूविरोधी संघटना हिंदूंना उपद्रव करत आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे योगेश अग्रवाल आपल्या भाषणात म्हणाले. हिंदू जागृतीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, हिंदूंनी संघटीत व्हावे, अन्यथा हिंदूंचे भविष्य कठीण आहे, असे अधिवक्ता पप्पू मोरवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले. हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित आंदोलनात समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.