Prayagraj : श्रीराम मंदिर निर्माण तसेच प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत विरोधकांतर्फे सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना यावर बंदी आणावी अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठेबाबत घेतलेल्या आक्षेपांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. ही बाब सनातन परंपरेच्या विरोधात असल्याचेही म्हटले आहे. प्राणप्रतिष्ठा आयोजनाद्वारे भारतीय जनता पार्टी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
गाजियाबाद येथील भोलादास नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. पौष महिन्यात धार्मिक कार्याचे आयोजन करत नाहीत. राम मंदीराचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे तेथे देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. याचिकेत असेही म्हटले आहे की, या कार्यक्रमाबद्दल शंकराचार्यांनी आपत्ती दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी या कार्यक्रमात सहभागी होणे संविधानाचे विरोधी कृत्य आहे. याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.