वाशिम : वाशिम शहरातील सर्व रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा अनुभव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी २९ सप्टेंबर रोजी घेतला. वाशिम येथे आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी ते वाशिम येथे आले होते. अकोला जिल्ह्यातून विभाजन झाल्यावर वाशिमला १ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. शहरातील रस्त्यांची डागडूजी तसेच नुतनीकरणाच्या कामांवर करोडो रूपयांचा निधी खर्च करण्यात आला, मात्र कमिशनबाजीमुळे अल्पावधीतच रस्त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत.
रस्ते दुरूस्तीसाठी नगरपालिकेकडे पैसे नाहीत अशी माहिती गडकरी यांना मिळाली. आपल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले नगरपालिकेकडे रस्त्यावरील खड्डे बुडवण्यासाठी पैसे नाहीत म्हणे, विष खरेदी करायला आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. गडकरी स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गडकरी यांच्या वक्तव्यामुळे नागरीकातून पालिकेच्या नाकर्तेपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.