Mumbai News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात न आल्याने आयोगाने महाराष्ट्रासह सात राज्यातील अधिकाऱ्यांना पदावरून हटविले आहे. महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून सोमवार (ता. 18) देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांवर यासाठी नाराजी व्यक्त करित बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना 18 मार्च सांयकाळी सहा वाजेपर्यंत हटवित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेशही आयोगाने दिले आहेत. मुंबईसह उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथील गृहसचिवांना हटविण्यात आले आहे. 16 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यावेळी सांगण्यात आलेल्या काही महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी पालन केले नव्हते.
दुहेरी कार्यभार भोवला
सात राज्यांमधील काढण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकड संबंधित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दुहेरी कार्यभार होता. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेल्या विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षा दलांच्या तैनातीमध्ये तडजोड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पश्चिम बंगालचे पोलिस महानिरीक्षक (DGP) राजीव कुमार यांना हटविण्यात आले आहे. यापूर्वीही पश्चिम बंगालमध्ये 2016 मधील विधानसभा निवडणुकीत आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यानही निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालकांना हटविले होते. आता पुन्हा हाच निर्णय घेण्यात आला आहे.