अकोला : शहरातील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याला पोलिस विभागाने प्राधान्य द्यावे. कोणत्याही दुर्लक्षामुळे अपघात घडणार नाही, याकडे कटाक्ष असावे अशी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी पोलिस विभागाला केली.
अकोला पोलिस विभागासोबत शहरातील वाहतूक समस्येवर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. अकोल्यातील वाशीम बायपास, टॉवर चौक, अशोक वाटिका चौक येथे कर्मचाऱ्यांची व्यवस्थित ड्यूटी संदर्भात लक्ष केंद्री करावे. भविष्यात अपघाताचा प्रकार होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या कक्षात झालेल्या या बैठकीला शहर आणि जिल्हा वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाशिम बायपास येथे अपघातात एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आमदार सावरकर यांनी तातडीने पोलिस विभागासोबत बैठक घेत त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अशोक वाटिका, वाशीम नाका, लक्झरी बस स्टॅन्ड महाराज अग्रसेन चौक, बस स्टॅन्ड, नेहरू पार्क या भागांकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी केल्या. वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध व वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात विशेष मोहिम सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राऊत यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिलेत. माधव मानकर, अक्षय जोशी, दिलीप मिश्रा, अमोल गोगे, हेमंत शर्मा, अमोल गीते, मंगेश सावरकर, विजय ठाकूर, अमोल मोहकार, विजय चौधरी यावेळी उपस्थित होते.